INDvsSL : विराटने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला ब्रेक!
Virat On Greatest Batsmen

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. अशा परिस्थितीत, आता असे मानले जात आहे की तो आयपीएल 2023 पूर्वी भारतासाठी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही.

विराटचा टी 20 फॉरमॅटमधून ब्रेक

विराट कोहलीच्या ब्रेकबद्दल माहिती देताना, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, “होय, विराटने कळवले आहे की तो T20 साठी उपलब्ध नसेल. वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल. मात्र, तो टी-20 इंटरनॅशनलमधूनही ब्रेक घेत आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, आम्हाला त्याच्या पुनरागमनाची घाई करायची नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे येत्या काळात ठरवले जाईल. त्याने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे, पण आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही.’

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट दिसणार नाही

विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय मधून ब्रेक घेण्याच्या निर्णयानंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T20 मालिकेत तो दिसणार नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका पुढील वर्षी 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. याआधी सर्वांना वाटत होते की विराट या मालिकेत उपलब्ध होईल पण विराटने टी-20 मधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

भारत आणि श्रीलंका मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

श्रीलंकेचा संघ आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात तर तिसरा आणि अंतिम सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. यानंतर, दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाईल. यातील पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटी, 12 जानेवारीला कोलकाता, तर तिसरा आणि अंतिम वनडे सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल.