Shiv Sena: महामोर्चा सुरु असतानाच ठाकरेंना मोठा धक्का, 'तो' आमदार शिंदेंच्या वाटेवर?

shiv-sena:-महामोर्चा-सुरु-असतानाच-ठाकरेंना-मोठा-धक्का,-'तो'-आमदार-शिंदेंच्या-वाटेवर?
ऋत्विक भालेकर

MLA Prakash Phaterpekar: मुंबई: एकीकडे आज महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) महामोर्चा (Mahamorcha) सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर (prakash phaterpekar) हे महाविकास आघाडीचा महामोर्चात सहभागी न होता ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थित असल्याचे दिसून आले. फक्त आमदार प्रकाश फातर्फेकर नव्हे तर शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर हे देखील या कार्यक्रमात हजर होते. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (uddhav thackeray got a big shock while maha morcha was going on mla prakash phaterpekar on shindes path)

चेंबूरमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखानाचे’ उद्घाटन कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर उपस्थित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली.

आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटातील प्रचंड आमदार फोडले आहेत. याच बंडखोर आमदारांच्या मदतीने आणि भाजपच्या साथीने त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं. मात्र, असं असलं तरीही अद्यापही ठाकरे गटातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे कसं वळवता येईल याचा शिंदे गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. अशातच आमदार फातर्फेकर आणि माजी नगरसेवक पाटणकर यांची राहुल शेवाळेंसोबतची उपस्थिती ही ठाकरे गटाला नक्कीच खटकणारी होती.

एकीकडे मुंबईतच महाविकास आघाडीने सरकारविरोधात महामोर्चा काढलेला असताना दुसरीकडे मुंबईतीलच आमदार असलेल्या फातर्फेकरांनी मात्र या मोर्चाकडे अक्षरश: पाठ फिरवत शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाणं पसंत केलं. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणखी एक हादरा बसणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. असं असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फातर्फेकरांचं संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने हाताळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महामोर्चात उद्धव ठाकरे काय म्हणाले?

‘बऱ्याच वर्षाने एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा या मोर्चाची घोषणा केली तेव्हा काही जणांनी मला विचारलं की, तुम्ही एवढं चालणार का? तेव्हा मी म्हटलं की, मी एकटाच नाही तर माझ्यासोबत महाराष्ट्रप्रेमी हे नुसतेच नाही तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत.’

‘आजपर्यंत ज्यांनी-ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्रानंतर असं दृश्य देशाने आणि जगाने पहिल्यांदाच पाहिलं असेल. 60-62 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बराच संघर्ष करावा लागला. पण अजूनही बेळगाव, कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही.’

‘आज सर्व पक्षाचे झेंडे ही ताकद महाराष्ट्राची आहे. सर्व पक्ष एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही आहेत जे या पक्षात एकवटलेले नाहीत. स्वत:ला जे बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तोतये त्यांचे विचार पुढे घेऊन जातोय असं सांगणारे.. पण बाळासाहेबांचे विचार हे खुर्चीसाठी दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तरी बेहत्तर पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता हिच्याबरोबर करु देणार नाही. जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला खाली झुकविल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेनाप्रमुखांची निती होती.’

‘जर सावित्रीबाई, महात्मा फुले नसते तर आपण कुठे असतो. त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्याने भीक हा शब्द वापरुन दाखवून दिला आहे. सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी धोंडमार सहन केली नसती तर आपल्याला शिक्षणच मिळालं नसतं आणि आपण पण यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे.’

‘यांच्या मंत्रिमंडळात मंत्री कसे आहेत तर एक हे बौद्धिक दारिद्र्य असलेले, दुसरे आमच्या सुप्रिया ताईंना वेडंवाकडं बोलणारे आणि छत्रपतींचं नाव घेणार. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीए. हे लफंगे आहेत. ते महाराष्ट्र लुटायला आले आहेत. या लफंग्यांना महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.’ अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *