Sanjay Raut: 'तुम्ही दिल्ली घ्या, आम्ही..,' राऊतांचा भाजप आणि AAP वर गंभीर आरोप


Sanjay Raut on Gujarat Elections: मुंबई: एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये (Gujarat Assembly Elections) भाजप (BJP) ऐतिहासिक विजयाची नोंद करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘जर गुजरातमध्ये ‘आप’ किंवा अन्य पक्षांनी एकत्रित येऊन काही आघाडी केली असती तर नक्कीच काँटे की टक्कर झाली असती. पण दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा असं काही तरी डील झालं असावं.’ असा आरोप करत राऊतांनी गुजरात विधानसभा निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (a big deal between bjp and aap in gujarat assembly elections shiv sena leader sanjay raut has made a sensational allegation)
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
’15 वर्षाची सत्ता भाजपसारख्या पक्षाकडून खेचून घेणं ही सोप्पी गोष्ट नाही’
‘दिल्लीत आपने भाजपची 15 वर्षांची सत्ता खेचून घेतली. मतविभागणी झाली नसती तर ‘आप’ला अधिक चांगल्या जागा मिळाल्या असत्या. पण तरीही निकाल देशाच्या राजधानीत आपला मिळाले आहेत ते कौतुकास्पद आहे. 15 वर्षाची सत्ता भाजप सारख्या पक्षाकडून खेचून घेणं ही काही सोप्पी गोष्ट नाही.’ असं म्हणत राऊतांनी दिल्ली महापालिका निवडणुकीतील निकालाबाबत आम आदमी पार्टीचं कौतुक केलं आहे.
‘दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा’
‘दुसरा निकाल पाहतोय गुजरातचा. तो अपेक्षित आहे. तिकडे जर आप किंवा अन्य पक्षांनी एकत्रित काही आघाडी केली असती तर नक्कीच काँटे की टक्कर झाली असती. पण दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा असं काही तरी झालं असावं अशी लोकांना शंका आहे.’ अशी टीका राऊतांनी यावेळी भाजप आणि आपवर केली आहे.
‘हिमाचलमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस चांगली लढत देत आहे आणि हे चित्र आशादायी आहे. गुजरातमधील निकालांबद्दल आम्ही भाजपचं अभिनंदन करतो. आपचं सुद्धा दिल्लीसाठी अभिनंदन करतो.’
‘…तर 2024 साली देशात परिवर्तन होईलच’
‘विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, मतविभागणी टाळणं गरजेचं आहे. आपआपसातले मतभेद, अंहकार दूर ठेवून लढाई केली तर 2024 साली देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.’ असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केली आहे.
‘राहुल गांधी वेगळ्या मिशनवर’
‘राहुल गांधी हे वेगळ्या मिशनवर आहेत. त्यामुळे या निकालाचा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेशी संबंध जोडणं चुकीचं आहे. राहुल गांधी हे राजकारणापासून बाहेर आहेत.’ असं म्हणत राऊतांनी एक प्रकारे राहुल गांधींची पाठराखणच केली आहे.
‘मी फक्त दोन शब्द वापरले तर तुमचा तीळपापड होतो’
‘या देशात आणि महाराष्ट्रात शिवसेनेने कधीही कोणाला भडकवलेलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्रत सतत होत आहे. राज्यपाल, मंत्री आणि प्रमुख प्रवक्ते हे सातत्याने महाराजांचा अपमान करत आहेत. खरं तर भाजपची डीएनए टेस्ट करावी लागेल. कारण भाजप महाराष्ट्रात सत्तेत असूनही महाराजांच्या सोबत नाही. त्यांची लोकं महाराजांचा सारखा अपमान करत आहेत.’
‘जेव्हा आम्ही यावर काही बोलतो तेव्हा तुम्ही आम्हाला धमकी देता. मी महाराष्ट्रासाठी पुन्हा तुरुंगात जायला देखील तयार आहे. मी षंढ शब्द वापरला होता. तो आपल्या शब्दकोशात आहे. जो काही काम करत नाही, बिनकमाचा आहे. त्यासाठी हा शब्द आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई केलीत? त्यासाठी मी तो शब्द वापरलाय. तुम्हाला दोन शब्द वापरले तर तुमचा तीळपापड होतो. कृती करा, कृती करुन दाखवा. तुम्ही सत्तेवर आहात.’ असं आव्हानच संजय राऊतांनी दिलं आहे.