&

चेतन पाटील
Updated on: Jan 01, 2023 | 11:20 PM
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शिंदे गटातीलच एका मंत्र्याने व्यक्त केलीय. मात्र त्यासाठी त्यांनी ठाकरेंसमोर एक अटही ठेवलीय.
मुंबई : शिंदे गटातील नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आणि ही शक्यता मावळली. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शिंदे गटातीलच एका मंत्र्याने व्यक्त केलीय. पण यासाठी ठाकरेंसमोर एक अट ठेवण्यात आलीय.
शिवसेना एकत्र येण्याचे संकेत देत असतानाच मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. तर पळून गेलेल्या उंदरांनी आम्हाला शिकवू नये, असा पलटवार ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी केलाय.
दरम्यान अधिवेशन काळात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकरांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. विधान परिषद उपसभापतींच्या दालनात ठाकरे आणि केसरकरांमध्ये हा वाद झाला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीचा केसरकरांना जाब विचारला होता.
दीपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. त्यामुळे आता येत्या काळात राज्यातील समीकरण बदलणार का? हे आता पाहावं लागेल.