पर्यावरण मंत्री इकडे लक्ष द्या! केमिकलचे पाणी थेट समुद्रात सोडल्याचा live video

राहुल पाटील (पालघर), 25 डिसेंबर : बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील क्षमतेपेक्षा जास्त असलेल घातक रासायनिक प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून या घटनेच चित्रीकरण केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हे केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडलं जात असताना समुद्रासह परिसर विद्रुप झाल्याचे चित्र दिसत असून यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करून नांदगावजवळील समुद्रात सोडण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र अनेक वेळा या सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया न करताच हे रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडलं जात असल्याच उघड झालं आहे. यामुळे या समुद्रातील पाण्याचे दोन भाग झालेले पाहायला मिळाले. या सगळयामुळे बोईसर एमआयडीसी, एमपीसीबी आणि सीईटीपीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून यामुळे समुद्रातील मत्स्य बिजासह परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच पुन्हा एकदा समोर आलं आहे.
हे ही वाचा : ..’त्या दिवशी संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’; शिदे गटाचा पुन्हा हल्लाबोल
बोईसर तारापूर एमआयडीसीत साडे बाराशे पेक्षा ही जास्त लहान मोठे कारखाने असून या कारखान्यांमधून निघणाऱ्या केमिकल युक्त रासायनिक प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी बोईसर औद्योगिक क्षेत्रात सीईटीपी प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटमध्ये कंपन्यांमधून येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून नंतर हे पाणी नांदगाव समुद्रकिनाऱ्यालगतच्या समुद्रात सोडल जात.
औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील क्षमतेपेक्षा जास्त असलेल घातक रासायनिक प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. pic.twitter.com/1CSVwal8BI
— News18Lokmat (@News18lokmat) December 25, 2022
मात्र अनेक वेळा क्षमतेपेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी झाल्याने या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे प्रदूषित सांडपाणी समुद्रात सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. असाच काहीसा प्रकार कोस्ट गार्डने केलेल्या चित्रीकरणानंतर उघड झाला आहे. बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने हे एमआयडीसी ने पुरवठा केलेल्या पाण्यापेक्षाही अधिक पाण्याचा बेकायदेशीरपणे वापर करत असून त्यामुळे हा प्रश्न उद्भवत असल्याच येथील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊदशी संबंध; तिला आदित्य ठाकरेंनी पाठिशी घातलं, राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप
बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखाने प्रदूषण करत असून हरित लवादाने यापूर्वी येथील कारखान्यांना 160 कोटी रुपये दंड ठोठावला होता. मात्र अजूनही येथील कंपन्या, एमआयडीसी, एमपीसीबी आणि सीईटीपी प्लांट्चा मनमानी कारभार आजही सुरूच आहे. त्यामुळे येथील कारखाने हे स्थानिक नागरिक, कामगार आणि पर्यावरणाशी खेळ करत असल्याच पुन्हा एकदा स्पष्ट झाल आहे. या घटनेनंतर तरी एमपीसीबी आणि सीईटीपी ला जाग येईल का असा सवाल येथील स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.