देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट परतणार! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतचं नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याचं उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं होतं.
दरम्यान, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होताच देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक महत्वकांक्षी प्रकल्प ‘जययुक्त शिवार योजना’ राज्यात पुन्हा सुरु होणार आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मृद आणि जलसंधारण विभागाच्या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
युती सरकारमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरु केली होती. मात्र कॅगने या योजनेवर ताशेरे ओढले असून यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकारनं ही योजना बंद केली होती. तसंच कथित घोटाळ्यांची चौकशीही सुरु करण्यात आली होती. मात्र शिंदे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या, त्या चौकशा बंद करण्याची घोषणा केली होती.
फडणवीस यांनी ज्या कामांमध्ये गडबड नाही आणि केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र संशय असलेल्या ठिकाणची चौकशी सुरु राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तेव्हापासूनच ही योजना पुन्हा सुरु होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार ही योजना आहे तरी काय?
‘जलयुक्त शिवार’ म्हणजे शिवारात (शेतात) पडलेले पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये मुरवणे किंवा जमिनीवर वर्षभर साठवून ठेवणे. जलयुक्त शिवार योजनेमुळं नाल्यामध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस नदीत साचून राहील व विहिरी कोरड्या पडणार नाहीत. त्याअंतर्गत गावाच्या पाणलोट क्षेत्रावर जल व मृद् संधारणाची कामे करावी लागतात.